आमच्या पोटचा गोळा गेला, आम्हाला न्याय द्या म्हणत नागरिकांनी साडेतीन तास महामार्ग रोखला.यामुळे वाहनांच्या १० किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या.
शाळा सुटल्यांनतर साेग्रस येथून मुंबई-आग्रा महामार्गावरून घरी जात असलेल्या विद्यार्थ्यांना गाडीचालकाने चिरडले. या भीषण अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला तर ११ जखमी झाले अाहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी महामार्गावर साडेतीन तास ठिय्या आंदोलन केले.
.
गडचिरोली जिल्ह्यात गुरुवारी पहाटे रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या ६ मुलांना ट्रकने चिरडले .त्यात ४ ठार झाले होते. त्यापाठोपाठ हा दुसरा अपघात नाशिक जिल्ह्यात झाला. तालुक्यातील सोग्रस येथील अजितदादा पवार माध्यमिक विद्यालयातील मालसाने, भुत्याने गावातील २० ते २५ विद्यार्थी शुक्रवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर मुंबई-आग्रा महामार्गावर सोग्रस मालसाने अरुंद पुलावर वडाळीभोईकडून चांदवडकडे भरधाव वेगात येणारा छोटा हत्ती टेम्पो (एमएच १५, एचएच ३५५९) चालकाने समोरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना चिरडले.
या भीषण अपघातात विद्यार्थ्यांच्या अंगावरून टेम्पो गेल्याने विद्यार्थी गंभीर जखमी झाले. यात अक्षय रमेश महाले (१५, भुत्याने) हा ठार झाला. घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या नातलगांनी सोग्रेस चौफुलीवर येत मुंबई-आग्रा महामार्गावर ठिय्या दिला. यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दुतर्फा सुमारे १० किमी अंतरापर्यंत रांगा लागल्या होत्या.अपघातातील तीन जखमी मुलांना चांदवड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
आक्रमक ग्रामस्थांनी टेम्पाे दिला उलटून
अपघातानंतर मद्यधुंद अवस्थेतील टेम्पो चालक हा पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना टेम्पो बंद पडला. त्यामुळे नागरिकांनी त्याला पकडत टेम्पो महामार्गावर पलटी केला. तेथेच ठिय्या दिला. २०० मीटर अंतरापर्यंत आम्हाला फरफटत नेले.
सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर आम्ही २० ते २५ मुले साेग्रसकडून मालेसाणेकडे घरी जात असताना समोरून एक गाडीवाला जोरात आमच्या दिशेने आला. आम्ही सर्व बाजूला होण्याचा प्रयत्न केला. मात्र पूल छोटा असल्याने आम्हाला पळता आले नाही, त्या काही वेळातच त्या गाडीवाल्याने आमच्या अंगावर गाडी घातली. २०० मीटर अंतरापर्यंत आम्हाला फरफटत नेले. आजूबाजूचे लाेक पळत आले. त्यानंतर मला जेव्हा समजले तेव्हा मी दवाखान्यात हाेते.
– वर्षा गाेधडे (१६), जखमी विद्यार्थिनी.