Amravati Crime News: अमरावतीमध्ये हत्या करण्यात आलेल्या महिला पोलीस अंमलदाराच्या हत्येसंदर्भात एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांना या प्रकरणामधील आरोपी सापडला असून त्याला अटक करण्यात यश आलं आहे. अमरावतीला हादरवणाऱ्या या हत्या प्रकरणातील आरोपी हा मयत महिलेचा पतीच असून तो सुद्धा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहे.
नक्की काय माहिती समोर आलीये?
अमरावती शहरातील महिला पोलीस अंमलदारा आशा घुले हत्या प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळाले आहे. पोलीस तपासामध्ये समोर आलेल्या धक्कादायक माहितीने एकच खळबळ उडाली आहे. राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असलेला आशाचा पती राहुल तायडेनेच तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. राहुलनेच कट रचून पोलीस पत्नीला संपवल्याची माहिती तपासामध्ये मिळाली आहे. राहुल तायडेने दोन मित्रांच्या मदतीने पत्नीला संपवल्याचं तपासाअंती सिद्ध झालं आहे.
हत्येचं नेमकं कारण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, राहुल तायडेने दोन मित्रांची मदत घेत पत्नी आशाची गळा आवळून हत्या केल्याचं निष्पन्न झालं आहे. आरोपी पतीने एक महिन्यापूर्वी हत्येचा कट रचला होता, असं तपासात समोर आलं आहे. अमरावतीच्या फ्रेजरपुरा पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी राहुल तायडेचे एका महिलेशी प्रेम प्रकरण होत त्यातून सतत पत्नीशी वाद व्हायचे. 4-5 वर्षापासून आरोपीचे बाहेरील महिलेशी प्रेम प्रकरण असल्याची तक्रार पत्नीने पोलीस स्थानकामध्ये दाखल केली होती.
हत्येची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी काय केलं?
आशा यांची राहत्या घरात हत्या करण्यात आल्याने परिसरात एकच खळबळ उडालेली. अमरावती शहराच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन हद्दीतील गुरुकृपा कॉलनीमधील आशा यांच्या राहत्या घरात त्यांची हत्या करण्यात आली. 38 वर्षीय आशा या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. हत्येची माहिती मिळताच डीसीपी गणेश शिंदेंसह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल पोहलचे आणि तातडीने तपास सुरु करण्यात आला.
पतीवर संशयाचं मुख्य कारण काय?
आशा यांनी नोंदवलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना सुरुवातीपासूनच तिच्या पतीवर संशय होता. पोलिसांनी आशाची हत्या झाल्याचं समोर आल्यानंतर चौकशीसाठी महिलेचा पती राहुलला ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर राहुलने आपला गुन्हा कबुल केला आहे. आपणच कट रचून पत्नीचा काटा काढल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. सध्या पोलीस परिस्थितीजन्य पुरावे, घटनाक्रम आणि इतर सर्वच गोष्टींचा तपास करत आहे.