BJP challenges Khotkar: काँग्रेसचे जालन्यातील माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय.गोरंटयाल यांची रावसाहेब दानवेंसोबत असलेली मैत्री सर्वांना ठाऊक आहे.तर गोरंटयाल यांची अर्जुन खोतकरांशी असलेलं राजकीय वैरदेखील सर्वश्रुत आहे.त्यामुळे गोरंटयाल यांना भाजपात घेऊन भाजप खोतकरांना चॅलेंज देतंय का?, अशी चर्चा आता जालन्यात रंगू लागलीय.गेल्या 35 वर्षांपासून काँग्रेससोबत एकनिष्ठ असलेले जालन्यातील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी अखेर भाजपचं कमळ हाती घेतलं.भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार अशोक चव्हाण आणि रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
खोतकरांना ओपन चॅलेंज?
जालन्याचे नगराध्यक्ष आणि त्यानंतर 3 वेळा जालना विधानसभा मतदार संघातून आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिलीय.भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांच्या पुढाकारातून गोरंटयाल यांनी भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.यामुळे दानवेंनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा आहे.गोरंटयाल हे शिवसेनेचे जालन्याचे विदयमान आमदार अर्जुन खोतकर यांचे कट्टर विरोधक.तर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामधला वाद सर्वश्रुत आहे.त्यामुळे गोरंटयाल यांना भाजपात प्रवेश देऊन भाजप आणि रावसाहेब दानवेंनी खोतकर यांना ओपन चॅलेंज दिलयं का, अशी चर्चा सध्या जालन्यात सुरुये.दरम्यान जालना महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याची इच्छा गोरंटयाल यांनी व्यक्त करत खोतकरांना डिवचलंय.
प्रवेशामुळे भाजप बळकट?
गोरंटयाल यांचा भाजप प्रवेश शिवसेनेच्या चांगलाच जिव्हारी लागलाय.गोरंटयाल भाजपमध्ये गेल्यानं त्यांची भाजपशी आतापर्यंत असलेली जवळीक उघड झाल्याचं शिवसेनेनं म्हटलंय.दुसरीकडे भाजपनं मात्र गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलंय. भाजप बळकट करणं हे भाजपचं स्वप्न असून गोरंटयाल यांच्या प्रवेशामुळे भाजप बळकट होणार असल्याचा विश्वास भाजपनं व्यक्त केलाय.
मविआचा मतदार फुटणार?
गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशामुळे जालना विधानसभा मतदारसंघात अनेक उलथापालथी होण्याच्या शक्यता आहेत. मात्र गोरंट्याल यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेस किंवा मविआचा मतदार फुटणार नाही असा दावा शिवसेना ठाकरे पक्षानं केलाय.
महापालिका निवडणुकीत जालना काबिज करणार?
जालन्याच्या राजकारणात दीर्घकाळ कुणी कुणाचं शत्रू किंवा मित्र राहिलेला नाहीय. मात्र अर्जुन खोतकर आणि कैलास गोरंटयाल यांच्यामध्ये कायमच कुरघोडीचं राजकारण पाहायला मिळालेलं आहे. आतापर्यत गोरंटयाल कॉंग्रेसमध्ये राहून खोतकरांवर कुरघोडी करत राहिले. रावसाहेब दानवे अर्थात भाजपनं कैलास गोरंट्याल यांना पक्षात घेऊन शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना चेकमेट केलंय, अशी चर्चा आहे. येत्या महापालिका निवडणुकीत जालना काबिज करण्यासाठी भाजपनं उचललेलं हे पाऊल कितपत यशस्वी ठरतं, हे पाहणं महत्त्वाचंय.