Demand For President Rule In Maharashtra: गुरुवारी, 17 जुलै 2025 रोजी विधानसभेच्या इमारतीच्या लॉबीत झालेल्या हाणामारी प्रकरणानंतर राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे. विधानसभेच्या लॉबीमध्ये हाणामारी करणारे आरोपी हे मकोकाचा गुन्हा दाखल असलेले आरोपी आहेत, असा दावा करतानाच थेट राज्यपालांना आव्हान देण्यात आलं आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे खरोखरच संविधानचे संरक्षक असतील तर त्यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाकडे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस करावी असं म्हटलं गेलं आहे.
हा प्रकार फक्त दुर्देवी नाही तर…
विधानसभेतील हाणामारीवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. “टोळी युद्ध आहे हे. गँगवॉर आहे. काल विधानभवनात जो प्रकार घडला हा फक्त दुर्दैवी नाही दुःखद नाही धक्कादायक नाही तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक विधान माझ्या लक्षात आहे की, ‘मी महाराष्ट्राची सांस्कृती जपेन. संस्कृती बदलू देणार नाही.’ पण महाराष्ट्राच्या संस्कृतीला त्यांच्या कार्यकर्ते रोज डाग लावत आहेत. अनेक मार्गाने डाग लागत आहेत. भ्रष्टाचार असेल, हनी ट्रॅप असेल, आमदार निवासामध्ये टॉवेल गँग असेल, मंत्री पैशाच्या बॅगा घेऊन बसले आहेत, कारवाई होत नाही” असं राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले.
ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवण आहे का?
“मकोकाचे आरोपी, खूनाचे आरोपी, दाऊदचे हस्तक हे पक्षात घेतले जात आहेत. त्यांना विधिमंडळात घेतले जात आहेत ही या महाराष्ट्राची संस्कृती आहे?” असा सवाल राऊतांनी विचारला. “देवेंद्र फडणवीस यांना विचारायचे आहे ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कृती आहे का? ज्या संस्कारातून ते आलेले आहेत त्या संस्कारात हे सगळे बसते आहे का?” असे प्रश्न राऊत यांनी उपस्थित केले. फडणवीसांवर निशाणा साधताना, “त्यांच्या राज्यात सगळे सुरू आहे मुख्यमंत्री म्हणून ते खाली मान घालून बसलेले आहेत,” असा टोला लगावला.
भाजपा महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहे
“द्रौपदीचे वस्त्रहरण सुरू असताना धर्मराज ज्याप्रमाणे खाली मान घालून बसले होते त्या भूमिकेत देवेंद्र फडणवीस आहेत. वस्त्रहरणाला पांडवांचा पाठबळ होतं. पांडव कमजोर होते म्हणून द्रौपदीचे वस्त्रहरण ते उघड्या डोळ्याने पाहत होते. द्रौपदीला जुगारावर लावण्याची संस्कृती जी या देशात निर्माण झाली होती. मला वाटतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे नेते उघड्या डोळ्याने महाराष्ट्राचं वस्त्रहरण पाहत आहेत. त्याला सर्वस्वी जबाबदार फडणवीस आहेत कारण ते जुगाराच्या अड्ड्यावर बसले आहेत,” अशी घणाघाती टीका राऊतांनी केली.
हेच इतर कोणत्या राज्यात झालं असतं तर फडणवीसांनी…
“महाराष्ट्राच्या विधानसभेत काल काय घडलं काल गँगवॉर झाला. विधान भावनामध्ये गँगवॉर झाला. मी सभागृहात म्हणत नाही आहे विधान भवन म्हणत आहे. कोणाचे आरोपी मकोकाचे आरोपी दरोड्यामधील आरोपी हे काल विधान भवनातच्या लॉबीमध्ये होते. कोणी आणले त्यांना? काय कारवाई झाली? कालची घटना पाहिल्यावर शिवसेनेचं स्पष्ट मत झालं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटच लागायला पाहिजे,” असं राऊत म्हणाले. “राष्ट्रपती राजवट लागू केल्यास राज्य नियंत्रणात ठेवता येईल. हे गुंडांचे राज्य जर हे इतर कोणाच्या राज्यात झालं असतं कोणी अन्य मुख्यमंत्री असता तर हेच देवेंद्र फडणवीस विधान भावनांच्या पायरीवर येऊन किंचाळले असते, ‘हे सरकार बरखास्त करा येथे राष्ट्रपती राजवट लावा’. मग त्यांना असं वाटत नाही का त्यांनी आत्मचिंतन केलं तर त्यांना कळेल माझा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा लायकीचे झाला आहे,” असा टोमणा राऊत यांनी मारला.
राष्ट्रपती राजवटीची मागणी
“राज्यपालांनी जर ते खरोखर घटनेचे संविधानाचे रखवालदार असतील या राज्यात तर त्यांनी कालच्या घटनेचा अहवाल गृहमंत्रालयाला पाठवून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायलाच पाहिजे,” असंही राऊत म्हणाले.
दाऊद इब्राहिमचे हस्तक विधिमंडळाच्या आवारात
“दोन आमदारांचे समर्थक म्हणत नाही. समर्थक अशा प्रकारचे हल्लाबोल करत नाही. भाजपच्या आमदारांबरोबर जे लोक होते काल त्यांचा रेकॉर्ड तपासा त्यांचे रेकॉर्ड समोर आले आहेत. असे किती मकोकाचे आरोपी आहेत. मोकाचे आरोपी दाऊद इब्राहिमचे हस्तक हे विधिमंडळाच्या आवारात तुमच्या राज्यात यायला लागले आहेत ,उद्या ते विधानसभेत जातील आणि अशा प्रकारचा गँगवॉर हा सभागृहात होईल त्याला भारतीय जनता पक्ष उत्तेजन देईल,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.
अंडरवर्ल्डसारखी भाजपामध्ये गुंडाची भरती
“गेल्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षात ज्या लोकांची भरती झाली आहे ही भरती पूर्वी जी गुंडांची भरती व्हायची, अंडरवर्ल्डमध्ये भरती व्हायची ठिकठिकाणी आम्ही पाहिलं आहे ही त्या प्रकारची ही भरती आहे,” असा टोला राऊतांनी लागवला.
हनी ट्रॅपवर फडणवीस बोलले नाहीत
“हे जे हनी ट्रॅप प्रकरण सत्तेत चाललं आहे नाशिक आणि इतरत्र त्याच्यावर देवेंद्रजी काही बोलले आहेत का? नाना पटोले असतील, जयंतराव पाटील असतील, विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असतील, अनिल परब असतील प्रत्येकाने हा विषय विधिमंडळात मांडला त्याच्यावर सरकार मत काय आहे? कालच्या घटनेबद्दल सरकारचं मत काय?” असे प्रश्न राऊतांनी विचारलेत.
…म्हणून विरोधीपक्ष नेता नको
“यांना विधानसभेत विरोधी पक्ष नेता त्यासाठीच नको आहे. या सगळ्या वर तो आवाज उठवेल आणि सरकारला जाब विचारायला म्हणून विरोधी पक्ष नेता होऊ देत नाही आहेत,” असं राऊत म्हणाले.
आव्हाड यांना मारण्याचा कट
“गुंड टोळ्या विधानसभेपर्यंत पोहोचल्या विधानसभेच्या दारापर्यंत पोहोचल्या. काल फक्त चाकू, सुरे, हत्यारं बाहेर काढायचे गरज होती. काल त्यांच्याकडे त्यांच्या गाड्यांमध्ये या प्रकारची हत्यार होती. मकोकाच्या आरोपीकडे! ही माझी माहिती आहे आणि जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट होता ही सुद्धा पक्की माहिती, असा खळबळजनक आरोप राऊत यांनी केला आहे.