Mumbai Pune Railway : कर्जत-पळसधरी रेल्वेमार्गावर मालगाडीच्या एका बोगीची चाके निखळल्याची घटना घडली. या तांत्रिक बिघाडामुळे मुंबई-पुणे दरम्यानची रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. अनेक प्रवाशी गाड्या खोळंब्याने प्रवाशांचे हाल झाले. रेल्वे प्रशासनाने दुरुस्तीचे काम सुरू केले असून सेवा लवकरात लवकर सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मालगाडीचा कर्जत-पळसधरी येथे एका बोगीची अचनाक चाके निखळली. या घटनेनंतर पुण्याकडे जाणारी वाहूतक ही पूर्णतः विस्कळीत झाली. त्यामुळे ती बोगी हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. ऐन पावसाळ्यात अशी घटना घडल्याने एक्स्प्रेस आणि मेल या गाड्यांधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागला.
या रेल्वे गाड्यांवर परिणाम
कर्जत-पळसधरी या ठिकाणी घटलेल्या या घटनेमुळे जोधपूर हडपसर, सोलापूर वंदे भारत, कोणार्क एक्सप्रेस आणि पनवेल, नांदेड या सर्व ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम झाला. यामधील काही ट्रेन या पनवेल स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत.
कर्जत-लोणावळा दरम्यान वारंवार रेल्वेच्या घटना का घडतात?
कर्जत-लोणावळा हा भाग सह्याद्रीच्या डोंगररांगा ओलांडतो. या ठिकाणी तीव्र चढ-उतार, वळणे आणि बोगदे आहेत. यामुळे तांत्रिक अडचणी आणि देखभाल अधिक कठीण होते. या घाट भागात मालगाड्यांना जास्तीचा जोर लागतो. त्यामुळे अनेकदा अशा घटना घडतात. दररोज या मार्गावरून जड मालवाहतूक केली जाते. यामुळे चाके, ब्रेकिंग सिस्टम आणि ट्रॅकवर अधिक दाब पडतो. यामुळे चाके निखळणे, ब्रेक निकामी होणे अशा घटना घडत असतात.
पावसाळ्यात धोकादायक स्थिती
पावसाळ्यामध्ये भूस्खलन, ट्रॅकवर झाडं पडणे, ट्रॅक स्लिप होणे यामुळे अशा घटना घडतात. तसेच घाट असणाऱ्या भागात मोठ्या प्रमाणात धुकं आणि ओलसरपणा असल्यामुळे दृश्य मर्यादा कमी होते. परिणामी यावेळी दुर्घटना होण्याची शक्यता जास्त असतात. तसेच या घाट भागात दुरुस्ती आणि देखभाल करणे हे तांत्रिक दृष्टिकोनातून खूप कठीण असते. सततच्या वापरामुळे रेल्वे ट्रॅक आणि इतर काही गोष्टींवर ताण येतो.