Raj Thackeray Post: मिरा रोड येथे मराठीच्या अस्मितेसाठी एल्गार पुकारण्यात आला. कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा म्हणत हजारो मराठी लोक मोर्चासाठी एकवटले. यामध्ये मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला. या मोर्चातून मराठीचा अपमान करणा-यांना इशारा देण्यात आला आहे. दरम्यान या मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पक्षातील नेते, कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे. माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही असं राज ठाकरेंनी सांगितलं आहे.
राज ठाकरेंनी पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?
“एक स्पष्ट आदेश. पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओ सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही. आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे त्यांनी देखील मला विचारल्याशिवाय, माझी परवानगी घेतल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या माध्यमांशी संवाद साधायचा नाहीये, आणि सोशल मीडियावर व्यक्त व्हायचं नाही,” असं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये सांगितलं आहे.
एक स्पष्ट आदेश… पक्षातील कोणीही वर्तमानपत्रं, वृत्तवाहिन्या किंवा कोणत्याही डिजिटल माध्यमांशी संवाद साधायचा नाही. तसंच स्वतःचे प्रतिक्रियांचे व्हिडीओज सोशल मीडियावर टाकायचे हे पण अजिबात करायचं नाही.
आणि माध्यमांशी संवाद साधण्याची अधिकृत जबाबदारी ज्या प्रवक्त्यांना दिली आहे…
— Raj Thackeray (@RajThackeray) July 8, 2025
ठाण्यातील नेते राज ठाकरेंना भेटण्याची शक्यता
उद्या म्हणजेच बुधवारी ठाण्यातील मनसे नेते राज ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे. मिरा भाईंदरमधील आंदोलन यशस्वी झाल्यानंतर नेते राज ठाकरे यांची भेट घेतील अशी शक्यता आहे. अविनाश जाधव, अभिजीत पानसे यांच्यासह इतर पदाधिकारी राज ठाकरेंना भेटू शकतात.
राज ठाकरे मिरा भाईंदरला जाणार?
आज मिरा रोडमध्ये झालेल्या आंदोलनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच मीरा भाईंदरला जाणार असल्याची माहिती आहे. आज झालेल्या आंदोलनानंतर राज ठाकरेंनी हा निर्णय घेतला आहे. मिरा भाईंदरमध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद पाहायला मिळत असून, 3 जुलै रोजी व्यापारी संघटनेनं मनसेच्या विरोधात आंदोलन केलं होतं. त्यानंतर या आंदोलनाला मनसेकडून आज आंदोलनाने प्रत्युत्तर देण्यात आलं. या वादाच्या पार्श्वभूमवर लवकरच राज ठाकरे मिरा भाईंदरला जाणार आहेत.