Raj Thackeray On Maharashtra Govt Withdraws Hindi Order: उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ नयेत म्हणून मोर्चाची हाक दिल्यानंतर हिंदीसंदर्भातील शासन आदेश रद्द केला असं बोललं जात आहे, असा उल्लेख करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंना पत्रकारांनी प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना राज ठाकरेंनी पुन्हा एकदा आपण 5 जुलैचा मोर्चा हा कोणत्याही पक्षाच्या झेंड्याखाली होणार नाही असं आधीच जाहीर केल्याची आठवण करुन दिली. राज ठाकरेंनी मराठीसंदर्भातील मेळाव्याला पक्षाचं लेबल लावलं जाऊ नये असं म्हटलं आहे.
या गोष्टींकडे तुम्ही…
“मोर्चाला पक्षीय लेबल लावून नका. विजयी मेळाव्याला पक्षीय लेबल लावू नका. कसं आहे, युत्या, आघाड्या या सगळ्या गोष्टी येत जात राहतील. मराठी भाषा संपली परत नाही येणार. कारण भाषा ही संस्कृती टिकवत असते. उद्या भाषाच मुळाशी गेली तर या युत्या, आघाड्यांना काय अर्थ आहे?” असा प्रतीप्रश्न राज यांनी पत्रकारांना विचारला. “या सगळ्या गोष्टींचा निवडणुकीच्या वेळी विचार करता येईल. त्याचा आता विचार करुन चालणार नाही. या गोष्टीकडे तुम्ही संकट म्हणूनच पहावं. त्याला राजकीय लेबलं लावू नयेत,” असंही राज यांनी म्हटलं.
अजित पवारांनी देखील विरोध केला
तसेच पुढे बोलताना, “कोणताही झेंडा नसेल मराठी हा अजेंडा असेल असं अधीच सांगितलेलं. सरकारमधील अनेक लोकांनी या निर्णयाला विरोध केला. मला वाटतं अजित पवारांनी देखील या गोष्टीला विरोध केला ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे,” असं राज ठाकरे म्हणाले.
नक्की वाचा >> ठाकरे एकत्र येणार! राज यांनीच दिली मनसे-शिवसेनेच्या संयुक्त मेळाव्याची माहिती; तारीखही सांगितली
जाधव येऊ देत किंवा…
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही शासन आदेश रद्द केल्याची घोषणा केली. त्यावेळी एकूणच त्रिभाषा सूत्रासंदर्भात ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेत एक समिती गठीत करीत असल्याची घोषणा त्यांनी केल्याचा संदर्भ देत राज यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना राज यांनी, “आमची भूमिका स्पष्ट आहे. पहिली ते पाचवी हिंदी चालणार नाही. जाधव येऊ देत किंवा इतर कोणी येऊ देत,” असं म्हटलं.
सर्व आमदारांना राज ठाकरेंचा खोचक सल्ला…
राज यांनी पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच आमदारांना एक खोचक सल्ला दिला. “महाराष्ट्रात खूप प्रश्न तुंबलेले आहेत. कृपया भाषेला मध्ये आणू नका. अधिवेशनात मुलभूत प्रश्नांवर चर्चा करावी. या विषयावर चर्चा करुन वेळ वाया घालवू नये. शिक्षणात अनेक त्रुटी आहेत. शाळा नाहीत, शिक्षकांना पगार नाहीत. एका एका शिक्षकावर वेगवेगळ्या विषयांचं ओझं टाकत आहात. इतर कामं दिली जात आहेत. त्या विषयांना हात घाला,” असं आवाहन केलं.