5 जुलैच्या मोर्चा आधीच ठाकरे बंधू अडकले कायद्याच्या कचाट्यात? नेमकं घडलं काय


5 July Morcha In Mumbai: शालेय शिक्षणामध्ये पहिल्या इयत्तेपासून हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं सरकारविरुद्ध थेट मैदानात उतरुन या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली आहे. दोन्ही सेनांबरोबरच विरोधी पक्षांकडून 5 जुलै रोजी मुंबईत गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला जाणार आहे. मात्र हा मोर्चा काढण्याआधीच ठाकरे बंधू कायद्याच्या कचाट्यात सापडणार असल्याचं चित्र दिसत आहे. 

शनिवारी पार पडली महत्त्वाची बैठक

5 जुलैच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते आणि पोलीस अधिकाऱ्यांची शनिवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मनसे नेत्यांनी मोर्चाच्या नियोजनाची सविस्तर माहिती पोलिसांना दिली. तसेच या मोर्चासाठी परवानगी देण्यासाठी अर्जही मनसेकडून सादर करण्यात आला. मात्र अद्याप (ही बातमी लिहीपर्यंत) पोलीस अधिकाऱ्यांकडून या मोर्चाला परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मनसे आणि शिवसेना वेगळे झाल्यानंतर तब्बल 18 वर्षांहून अधिक काळाने दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी निमित्त ठरणारा मोर्चा होणार की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे.

पोलिसांचं म्हणणं काय?

मनसे आणि शिवसेनेनं हा मोर्चा मुंबई उच्च न्यायालयाच्या नियम व अटीच्या अधिन राहून काढावा अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदान वगळता इतर ठिकाणी किंवा रस्त्यांवर मोर्चा किंवा आंदोलन करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. या आदेशानुसारच हिंदीसक्ती विरोधात निघणारा मनसे आणि शिवसेनेचा मोर्चाही न्यायालयाच्या अटी व नियमांच्या अधिन राहूनच करावा अशा सूचना पोलिसांकडून देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अधिवेशनचा कालावधी असल्याने या मोर्चाच्या परवानगीबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्याने समोर येत आहे.

उद्धव ठाकरेंवर निशाणा

दरम्यान, दुसरीकडे बडनेराचे आमदार रवी राणा यांनी, 5 तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा असल्याची टीका केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूकीत मत जमा करण्यासाठी हा मोर्चा असल्याचं आमदार रवी राणा म्हणाले आहेत. रवी राणा यांनी टीका केली असून उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे.

“उद्धव ठाकरे यांना आता मराठी माणसाविषयी प्रेम येत आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस मराठी माणसासोबत उभा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी ही नौटंकी थांबवावी. मुंबई महानगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठीचा मुद्दा समोर केला जात आहे. उद्धव ठाकरे यांना वाटते की आमचा झेंडा मुंबई महानगरपालिकेवर फडकला पाहिजे. मराठीचा कोणी महाराष्ट्रात विरोध करत नाही. पाच तारखेचा मोर्चा मतदारांची दिशाभूल करणारा मोर्चा आहे,” अशी टीका रवी राणा यांनी केली. मुख्यमंत्री बनण्यासाठी काँग्रेसच्या दरबारात उद्धव ठाकरे गेले असही रवी राणा म्हणाले आहेत.





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24