Mumbai News : हिंदीविरोधात 5 जुलैला होणा-या मोर्चावरून भाजप आक्रमक झालाय. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी मोर्चा काढला जात असल्याचा आरोप भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. तर त्रिभाषा सूत्राचा अहवाल हा उद्धव ठाकरेंनी स्वीकारल्याचा आरोप आशिष शेलारांकडून करण्यात आलाय.
पहिलीपासून हिंदी शिकवण्याला विरोधकांनी कडाडून विरोध केलाय. दरम्यान यानंतर भाजपकडून देखील आक्रमक भूमिका घेण्यात आलीय. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाच त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आलाय. दरम्यान यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील पलटवार करण्यात आलाय. मुख्यमंत्री असल्यामुळे ठाकरेंनी फक्त अहवाल स्वीकारला, मात्र, देवेंद्र फडणवीसांनी हिंदीसक्तीचा जीआर काढल्याचं म्हणत राऊतांनी शेलारांना प्रत्युत्तर दिलंय.
हिंदीच्या मुद्द्यावरून भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमनेसामने आली आहे. हिंदीवरून संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांकडे बोट दाखवलाय, दरम्यान यानंतर आशिष शेलारांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. राऊतांच्या बुद्धीमत्तेची चाचणी करावी लागणार असल्याचं म्हणत शेलारांनी निशाणा साधलाय. एवढंच नव्हे तर हिंदीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे पळ काढू शकत नाही असा इशारा देखील आशिष शेलारांनी दिलाय.
हेही वाचा : ‘मला राज ठाकरेंचा फोन आला…’, संजय राऊतांकडून मोठा खुलासा, ‘मी उद्धव ठाकरेंना सांगताच त्यांनी…’
ठाकरे बंधू मोर्चाच्या माध्यमातून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे. मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजी शिकल्यावर काय बिघडणार? असा सवाल भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी उपस्थित केलाय. तर भाजपनं मोर्चाचा धसका घेतल्यामुळे उलटसुलट चर्चा करत असल्याची टीका मनसे नेते यशवंत किल्लेदारांनी केलीय.
हिंदीच्या मुद्द्यावरून ठाकरेंचे नेते आणि भाजप नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना सुरू झालाय. पहिलीपासून हिंदी शिकवण्याला दोन्ही ठाकरेंनी विरोध केलाय. मात्र, त्रिभाषेचं सूत्र उद्धव ठाकरेंनीच स्वीकारल्याचा आरोप करत भाजपकडून पलटवार करण्यात आलाय.