Sanjay Raut To The Point Intrview: मुंबईत 5 जुलै रोजी उद्धव ठाकरेंची शिवसेना-मनसेचा एकत्रित मोर्चा निघणार असल्याने फक्त महाराष्ट्र नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे मराठीच्या मुद्द्यावर एकत्र येणार असल्याने या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. शिवसेना, मनसे नेत्यांकडून मराठीसाठी आंदोलन केलं जात असताना, भाजपाकडून या नेत्यांची मुलं कोणत्या शाळेत शिकली? असा सवाल उपस्थित केला जात आहे. नेहमी उपस्थित होणाऱ्या या प्रश्नाला खासदार संजय राऊत यांनी उत्तर दिलं आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीत त्यांनी माझ्या दोन्ही मुली मराठी शाळेत शिकल्याची माहिती दिली. तसंच अनेक शिवसेना नेत्यांच्या मुलांनी इंग्रजी माध्यमातून शिकल्याचंही सांगितलं.
मराठीसाठी मोर्चे काढणाऱ्या नेत्यांची मुलं कोणत्या माध्यमात शिकतात? अशी विचारणा नेहमी केली जाते या प्रश्नावर ते म्हणाले की, “हा त्यांचा प्रश्न आहे, पण माझी मुलं मराठी माध्यमातच शिकली. शिवसेनेच्या अनेक नेत्यांची मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकली पण ते मराठीत उत्तम व्यवहार करत आहेत. तुम्हाला त्या तोडीचं मराठी आलं पाहिजे. माझी मुलं मराठीत शिकली, पण इंग्रजीतही उत्तम व्यवहार करतात. जर वडील शिवसेनेचं काम करत आहे, शिवसेनेचं नेतृत्व करत असतील, मराठीसाठी आमचा संघर्ष सुरु आहे, जीवन दिलं आहे, तर माझ्या मुलांनी इंग्रजी शाळेत का जावं? सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे”.
माझ्या दोन्ही मुली साध्या मराठी शाळेत शिकल्या
“माझ्या दोन्ही मुली साध्या मराठी शाळेत शिकल्या आणि याचा मला अभिमान आहे. त्यामुळे मी इंग्रजी, हिंदीला विरोध केलेला नाही. माझा विरोध सक्तीविरोधात आहे. सरकार सक्तीच करत आहे. ऐच्छिक वैगेरे काही नाही. यांच्यावर कोण विश्वास ठेवेल? त्रिभाषा सूत्रीच्या नावाखाली हे जबरदस्ती करत आहेत. हे आपल्यावर लादत आहेत. लादू नका, लोकांनी स्विकारु द्या,” असं परखड मत त्यांनी मांडलं आहे.
“देशाच्या व्यवहारात हिदी आहे’
“त्यांची हिंदीची परीक्षाही घेऊ नका, काही गरज नाही. हिंदी व्यवहारात हवी आहे ना, मग या देशाच्या व्यवहारात हिदी आहे. तुम्ही कितीही टाळलं तरी हिंदी आहे. ती टाळता येणार नाही,” असंही त्यांनी सांगितलं.
गृहमंत्री, पंतप्रधान स्वत:चं राज्य का वगळत आहेत?
“मुंबई, महाराष्ट्रात प्राथमिक शाळेत तुम्ही हिंदी सक्ती करु नका. मराठी, इंग्रजी या दोन भाषा पुरेशा आहेत. पाचवीनंतर विचार करु त्यांना कोणती भाषा शिकायची आहे. मुंबई, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मुलाला हिंदी शिकवण्याची आणि हिंदी सक्तीची गरजच नाही. गुजरातमध्ये ही सक्ती नाही. गृहमंत्री, पंतप्रधान स्वत:चं राज्य का वगळत आहेत? तिकडे हिंदीला विरोध करत आहेत आणि इथे आम्हाला केलं पाहिजे सांगत आहे. दक्षिणेत हिंदी होऊ दिलं नाही. जिथे विरोधकांची ताकद आहे तिथे फूट पाडत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यात हिंदी आहेच. मग उरलेल्या राज्यांवर का सक्ती करत आहेत?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.
‘हिंदी, हिंदू हा आरएसएसचा राजकीय अजेंडा’
“हिंदी, हिंदू हा आरएसएसचा राजकीय अजेंडा आहे. आम्ही हिंदूही आहोत आणि हिंदी है हम, वतन हिंदोस्ता हमारा बोलणारेही आम्हीच आहोत. तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे का शिकवत आहात? मराठी वाघिणिची भाषा आहे, क्रांतीकारकांची, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची भाषा आहे. आधी आम्हाला ती मराठी आत्मसात करु द्या. मराठी शाळा किंती बंद पडत आहेत पाहिलं का? उत्तर प्रदेशात हिंदीच्या साडे पाच हजार शाळा गेल्या काही काळात बंद पडल्या आहेत. त्याच्यावर काम करा. हिंदी तेथील मातृभाषा आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
‘मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य असा कायदाच करा’
“मराठी शाळा बंद पडणं यावर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. फक्च मोर्चे काढून काही होणार नाही. मुंबई, महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य असलं पाहिजे, तसा नियम, कायदाच झाला पाहिजे, ज्यांची मुलं परदेशात शिकत आहेत, शिकून आले आहेत त्यांच्या नावांची यादी जाहीर करा,” अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे.