‘सर्व सोडावं लागलं तरी आमची तयारी’, राज-उद्धव यांच्या युतीच्या चर्चांदरम्यान संजय राऊतांचं मोठं विधान, ‘नवी आघाडी…’


Sanjay Raut to The Point Interview: हिंदी, हिंदू हा आरएसएसचा राजकीय अजेंडा आहे. आम्ही हिंदूही आहोत आणि हिंदी है हम, वतन हिंदोस्ता हमारा बोलणारेही आम्हीच आहोत. तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे का शिकवत आहात? अशी विचारणा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.  झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीत त्यांनी भविष्यात लढावं लागलं आणि त्यासाठी सर्व सोडावं लागलं तरी आमची तयारी आहे असा निर्धारही बोलून दाखवला आहे. 

 

“मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझं संपूर्ण आयुष्य मराठीसाठी लढण्यात गेलं. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शालेय जीवनपासून सोबत राहिलेला मी कार्यकर्ता आहे. ओघाने पदं मिळत गेली. पण काम सुरु केलं तेव्हा खासदार होऊ, दिल्लीत 25 वर्षं राहून, पक्षाचा नेता होऊ असं कधी वाटलं नव्हतं. भविष्यात लढावं लागलं आणि त्यासाठी सर्व सोडावं लागलं तरी आमची तयारी आहे,” असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. 

 

‘मराठी माणसांची नवीन आघाडी निर्माण होणं गरजेचं’

पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रात मुंबई वाचवण्याची सर्वात मोठी लढाई आहे. मुंबई राज्याची राजधानी असून, त्यासाठी फार संघर्ष केला आहे. पण आज या मुंबईत मराठी माणसाला काही स्थान राहिलेलं नाही. याचं कारण व्यापारी वृत्तीच्या राज्यकर्त्यांकडे देशाची सूत्रं आहेत. मुंबईसारख्या शहरांची लूट कुरन त्यांना आपला व्यापार करायचा आहे. त्यासाठी जसं पोर्तुगीज, ब्रिटीश आले आणि मुंबईच शोषण केलं त्याप्रमाणे सरकारी पुरस्कृत उद्योगपती शोषण करत आहेत. यात सर्वाधिक मराठी माणसाचा बळी जात आहे. अशावेळी मराठीविषयी आस्था असणारे, मराठीसाठी लढण्यासाठी तयार असलेले राजकीय पक्ष, नेते यांनी एकत्र येऊन रणशिंग फुंकलं नाही तर मुंबई महाराष्ट्राची राहणार नाही आणि मुंबईत मराठी माणसांचा बुलंद आवाज तो शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केला तो अस्तंगत होतान दिसत आहे. मराठी माणसांची नवीन आघाडी निर्माण होणं गरजेचं आहे. जी 1956 सालात संयुक्त महाराष्ट्रावेळी झालं होतं. तसं एक आंदोलन आता होणं गरजेचं आहे”. 

‘मराठी माणसाच्या बाबतीत फोडा, झोडा आणि राज्य करा भूमिका’

“मराठी माणसाने एकत्र असलंच पाहिजे. मराठी माणसात फूट आहे किंवा मराठी विषयांवर काम करणाऱ्या मतभेद आहेत हे चित्र देशाला आणि सध्याच्या राज्यकर्त्यांना दिसता कामा नये. मराठी माणसाच्या बाबतीत फोडा, झोडा आणि राज्य करा ही दिल्ली आणि महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची भूमिका आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

‘…हा बाळासाहेबांचा मूळ विचार आहे’

“सगळे वाद मिटवून जातीय, पक्षीय मराठी माणसानं एकत्र राहावं आणि आपली बळकटी देशाला दाखवावी हा बाळासाहेबांचा मूळ विचार आहे. त्यातून अनेक लोक बाहेर पडले. बाहेर पडण्याचं कारण राजकीय स्वार्थच असतो. बाहेर पडलात तरी तुमचा मूळ विचार तोच आहे. शिवसेनेनं मूळ विचार बदललेला नाही. आम्ही मराठीचा मुद्दा घेताना, आम्ही हिंदुत्वाचा विचारही घेतला आहे, तो बाळासाहेबांच्या काळातच घेतला आहे. पण आता राज ठाकरे बाजूला झाले असतील. त्यांचाही विचार तोच आहे. तीन-एक वर्षांपूर्वी अमित शाह यांनी एक पक्ष काढून त्याला शिवसेना नाव दिलं तेसुद्धा मराठी मराठी करतात. पण आता सरकारमध्ये बसलेले असूनही गप्प बसले आहेत. ते आम्हाला हिंदी कशी स्विकारली पाहिजे हे समजावण्यासाठी येतात,” असा टोलाही त्यांनी लगावला. 

‘हिंदी, हिंदू हा आरएसएसचा राजकीय अजेंडा’

“हिंदी, हिंदू हा आरएसएसचा राजकीय अजेंडा आहे. आम्ही हिंदूही आहोत आणि हिंदी है हम, वतन हिंदोस्ता हमारा बोलणारेही आम्हीच आहोत. तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे का शिकवत आहात? मराठी वाघिणिची भाषा आहे, क्रांतीकारकांची, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची भाषा आहे. आधी आम्हाला ती मराठी आत्मसात करु द्या. मराठी शाळा किंती बंद पडत आहेत पाहिलं का? उत्तर प्रदेशात हिंदीच्या साडे पाच हजार शाळा गेल्या काही काळात बंद पडल्या आहेत. त्याच्यावर काम करा. हिंदी तेथील मातृभाषा आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे. 





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24