Sanjay Raut To The Point Intrview: मुंबई, महाराष्ट्रात प्राथमिक शाळेत तुम्ही हिंदी सक्ती करु नका. मराठी, इंग्रजी या दोन भाषा पुरेशा आहेत. पाचवीनंतर विचार करु त्यांना कोणती भाषा शिकायची आहे. मुंबई, महाराष्ट्रात जन्माला आलेल्या मुलाला हिंदी शिकवण्याची आणि हिंदी सक्तीची गरजच नाही असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं आहे. झी 24 तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या ‘टू द पॉइंट’ या मुलाखतीत त्यांनी मुंबई, महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य असा नियम, कायदाच झाला पाहिजे अशी मोठी मागणीही केली आहे.
“गुजरातमध्ये ही सक्ती नाही. गृहमंत्री, पंतप्रधान स्वत:चं राज्य का वगळत आहेत? तिकडे हिंदीला विरोध करत आहेत आणि इथे आम्हाला केलं पाहिजे सांगत आहे. दक्षिणेत हिंदी होऊ दिलं नाही. जिथे विरोधकांची ताकद आहे तिथे फूट पाडत आहेत. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यात हिंदी आहेच. मग उरलेल्या राज्यांवर का सक्ती करत आहेत?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.
‘मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य असा कायदाच करा’
“मराठी शाळा बंद पडणं यावर सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. फक्च मोर्चे काढून काही होणार नाही. मुंबई, महाराष्ट्रात जन्मलेल्या मुलांना पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण अनिवार्य असलं पाहिजे, तसा नियम, कायदाच झाला पाहिजे, ज्यांची मुलं परदेशात शिकत आहेत, शिकून आले आहेत त्यांच्या नावांची यादी जाहीर करा,” अशी मोठी मागणी त्यांनी केली आहे.
‘हिंदी, हिंदू हा आरएसएसचा राजकीय अजेंडा’
“हिंदी, हिंदू हा आरएसएसचा राजकीय अजेंडा आहे. आम्ही हिंदूही आहोत आणि हिंदी है हम, वतन हिंदोस्ता हमारा बोलणारेही आम्हीच आहोत. तुम्ही आम्हाला राष्ट्रभक्तीचे धडे का शिकवत आहात? मराठी वाघिणिची भाषा आहे, क्रांतीकारकांची, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांची भाषा आहे. आधी आम्हाला ती मराठी आत्मसात करु द्या. मराठी शाळा किंती बंद पडत आहेत पाहिलं का? उत्तर प्रदेशात हिंदीच्या साडे पाच हजार शाळा गेल्या काही काळात बंद पडल्या आहेत. त्याच्यावर काम करा. हिंदी तेथील मातृभाषा आहे,” असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
“मराठी माणसाने एकत्र असलंच पाहिजे. मराठी माणसात फूट आहे किंवा मराठी विषयांवर काम करणाऱ्या मतभेद आहेत हे चित्र देशाला आणि सध्याच्या राज्यकर्त्यांना दिसता कामा नये. मराठी माणसाच्या बाबतीत फोडा, झोडा आणि राज्य करा ही दिल्ली आणि महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांची भूमिका आहे,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.
‘माझ्यासारखं उत्तम हिंदी कोण बोलणार नाही’
“मी जी पोस्ट केली त्या प्रक्रियेची सुरुवात आदल्या दिवशी दुपारी झाली. उद्धव ठाकरेंकडे हिंदी सक्तीला विरोध करणारे कृती समितीचे दीपक पवार आणि सहकारी भेटायला आले होते. ते पाठिंबा मागण्यासाठी आले होते. आमच्याकडे काही मंत्री आले नाहीत, आमच्या दारात मंत्री येणार नाहीत कंवा शासनाचे अधिकारी येणार नाहीत. त्यांच्यात आणि आमच्यात भांडण आहे. त्यांनी आम्हाला महाराष्ट्र अस्मिता शिकवू नये. पण संस्था, संघटना येतात. अशावेळी जर मराठीच्या मुद्द्यावर शिवसेनेचा पाठिंबा, आमची ताकद मागितली तर ती आम्ही देणार. शिवसेना पक्षप्रमुखांनी यांच्या मागे उभं राहण्याची गरज असल्याचं सांगितलं. कोणत्याही भाषेला विरोध नाही, सक्तीला विरोध आहे. माझ्यासारखं उत्तम हिंदी कोण बोलणार नाही. मी संसेदत हिंदीतच भाषण करतो. देशात कुठेही गेलो तरी आम्ही हिंदीत संवाद साधतो,” असंही ते म्हणाले.
‘…महाराष्ट्राच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठेला शोभणारं नाही’
“माझी भूमिका नेहमी सगळ्यांना एकत्र यावं अशीच असतो. महाराष्ट्र आणि देशात गेल्या अनेक काळापासून एकपक्षीय राजकारण राहिलेलं नाही. भाजपा महाराष्ट्र आणि देशात मोठा पक्ष आहे. हा पक्षा त्यांच्या नेतृत्वामुळे लोकशाही मूल्यांपासून दूर जाताना दिसत आहे, गेलेलाच आहे. तुम्ही काल आणीबाणीची 50 वर्षं तुमच्या पद्धतीने साजरी केलीत. पण या देशात गेल्या काही काळापासून विरोध पक्षाच्या नेत्यांवर, उद्योगपतींवर निर्बंध लादले आहेत. हे देशाच्या आणि महाराष्ट्राच्या प्रतिमा आणि प्रतिष्ठेला शोभणारं नाही. त्यामुळे सर्व समविचारी पक्षांनी एकत्र आलं पाहिजे,” असं मत संजय राऊतांनी मांडलं आहे.
‘मराठी माणसांची नवीन आघाडी निर्माण होणं गरजेचं’
पुढे ते म्हणाले, “महाराष्ट्रात मुंबई वाचवण्याची सर्वात मोठी लढाई आहे. मुंबई राज्याची राजधानी असून, त्यासाठी फार संघर्ष केला आहे. पण आज या मुंबईत मराठी माणसाला काही स्थान राहिलेलं नाही. याचं कारण व्यापारी वृत्तीच्या राज्यकर्त्यांकडे देशाची सूत्रं आहेत. मुंबईसारख्या शहरांची लूट कुरन त्यांना आपला व्यापार करायचा आहे. त्यासाठी जसं पोर्तुगीज, ब्रिटीश आले आणि मुंबईच शोषण केलं त्याप्रमाणे सरकारी पुरस्कृत उद्योगपती शोषण करत आहेत. यात सर्वाधिक मराठी माणसाचा बळी जात आहे. अशावेळी मराठीविषयी आस्था असणारे, मराठीसाठी लढण्यासाठी तयार असलेले राजकीय पक्ष, नेते यांनी एकत्र येऊन रणशिंग फुंकलं नाही तर मुंबई महाराष्ट्राची राहणार नाही आणि मुंबईत मराठी माणसांचा बुलंद आवाज तो शिवसेनाप्रमुखांनी निर्माण केला तो अस्तंगत होतान दिसत आहे. मराठी माणसांची नवीन आघाडी निर्माण होणं गरजेचं आहे. जी 1956 सालात संयुक्त महाराष्ट्रावेळी झालं होतं. तसं एक आंदोलन आता होणं गरजेचं आहे”.
‘सर्व सोडावं लागलं तरी आमची तयारी’
“मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझं संपूर्ण आयुष्य मराठीसाठी लढण्यात गेलं. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर शालेय जीवनपासून सोबत राहिलेला मी कार्यकर्ता आहे. ओघाने पदं मिळत गेली. पण काम सुरु केलं तेव्हा खासदार होऊ, दिल्लीत 25 वर्षं राहून, पक्षाचा नेता होऊ असं कधी वाटलं नव्हतं. भविष्यात लढावं लागलं आणि त्यासाठी सर्व सोडावं लागलं तरी आमची तयारी आहे,” असंही त्यांनी स्पष्ट सांगितलं.
‘…हा बाळासाहेबांचा मूळ विचार आहे’
“सगळे वाद मिटवून जातीय, पक्षीय मराठी माणसानं एकत्र राहावं आणि आपली बळकटी देशाला दाखवावी हा बाळासाहेबांचा मूळ विचार आहे. त्यातून अनेक लोक बाहेर पडले. बाहेर पडण्याचं कारण राजकीय स्वार्थच असतो. बाहेर पडलात तरी तुमचा मूळ विचार तोच आहे. शिवसेनेनं मूळ विचार बदललेला नाही. आम्ही मराठीचा मुद्दा घेताना, आम्ही हिंदुत्वाचा विचारही घेतला आहे, तो बाळासाहेबांच्या काळातच घेतला आहे. पण आता राज ठाकरे बाजूला झाले असतील. त्यांचाही विचार तोच आहे. तीन-एक वर्षांपूर्वी अमित शाह यांनी एक पक्ष काढून त्याला शिवसेना नाव दिलं तेसुद्धा मराठी मराठी करतात. पण आता सरकारमध्ये बसलेले असूनही गप्प बसले आहेत. ते आम्हाला हिंदी कशी स्विकारली पाहिजे हे समजावण्यासाठी येतात,” असा टोलाही त्यांनी लगावला.
‘…तर हिंदी सिनेसृष्टी या मुंबई शहरात तुम्हाला दिसलीच नसती’
“हिंदी भाषेला विरोध नाही. तो आमच्या जीवनाचा, मुंबईचा एक भाग आहे. हिंदी सिनेसृष्टी या मुंबई शहरात तुम्हाला दिसलीच नसती. हिंदी साहित्य, हिंदी वृत्तपत्रं या इतर हिंदी भाषिक राज्यात नसतील तितके मुंबईत आहेत. हिंदी सिनेसृष्टी भोपाळ, लखनऊला का गेली नाही? योगी आदित्यनाथ यांनी मुंबईच्या तोडीची फिल्समिटी उभारण्याचं स्वप्न पाहिलं आहे. ते इथे येऊन गेले आहेत. अभिनेत्यांना वैगेरे भेटले आणि मुंबईच्या तोडीची फिल्समिटीस उभी करु अशी घोषणा केली. त्याला एक कालखंड लोटला आहे पण झालं का? मुंबईचं महत्वं आहे. देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीत मग ती हिंदी किंवा अन्य असेल. मुंबईचं महत्त्व कमी करुच शकत नाही,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केली.