राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे मनाने एकत्र आलेलेच आहेत. मराठी भाषा, मराठी अस्मिता यासाठी ज्या पद्धतीने महाराष्ट्र संयुक्त महाराष्ट्र चळवळीत एकत्र आला होता. तशीच भूमिका दोन्ही ठाकरे बंधूंची असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दोन मोर्चे हे योग्य वाटत न
.
यासंबधी माहिती देताना संजय राऊत म्हणाले की, हिंदी सक्ती विरोधात दोन्ही ठाकरे बंधु मराठी भाषेसाठी एकत्र आले आहेत. दोन मोर्चे निघणे हे योग्य वाटत नाही, हे सांगण्यासाठी मला राज ठाकरे यांचा फोन आला होता. त्यांची ही भूमिका मी उद्धव ठाकरे यांना कळवली. त्याला उद्धव ठाकरे यांनीही लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, सहा तारीख ही सोईची नाही. त्या दिवशी आषाढी एकादशी आहे. त्यामुळे एकतर राज ठाकरे यांनी सात तारखेच्या आंदोलनात सहभागी व्हावे, किंवा पाच तारखेला आंदोलन करावे, अशी भूमिका उद्धव ठाकरे यांनी मांडली. त्यानंतर मी राज ठाकरे यांच्याशी बोललो. त्यांनी देखील ते तत्काळ मान्य केले. आणि पाच तारखेला एकत्र मोर्चा काढण्याचा निर्णय झाला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
राज्याच्या मनात जे आहे, ते मी करेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. सुप्रिया सुळे यांनी देखील या विरोधात भूमिका मांडली होती. त्यामुळे हा सर्व निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा आणि महाराष्ट्रातील लोकांच्या मनातील असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. आम्हाला लढावे लागेल आणि त्याचे नेतृत्व ठाकरेंनी करावे, असे देखील राऊत म्हणाले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेच पाहिजे, ही महाराष्ट्राची भूमिका आहे. महाराष्ट्रातील मनात तेच असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या प्रश्नावर आम्ही एकत्र आहोत, असा दावा देखील संजय राऊत यांनी केला आहे.
वेळ सोईची नसल्याने वेळ बदलणार
मोर्चा कसा असेल? वेळ कोणती असेल? याविषयी आम्ही आता चर्चा करणार असल्याचे देखील संजय राऊत यांनी सांगितले आहे. सकाळी 10 वाजेची वेळ निश्चित झाली होती. मात्र, ती वेळ सोईची नाही, त्यामुळे या वेळेत बदल करण्यासाठी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे आता कुठे लपून बसले आहेत?
फडणवीस यांचे सरकार काय चर्चा करेल हा त्यांचा प्रश्न आहे. वास्तविक त्यांना या विषयावर काही भूमिकाच नाही. ते दिल्लीचा खुळखुळा वाजवत आहेत. शिवसेना म्हणून घेणारे एकनाथ शिंदे आणि मंडळींचे मला आश्चर्य वाटत आहे. अशावेळी ते कुठे लपून बसले आहेत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला. उदय सामंत कोणती भूमिका मांडतात? असा प्रश्नही त्यांनी विचारला. त्यांनी ठामपणे मराठी माणसाची भूमिका मांडायला हवी. सर्व विरोध झुगारून त्यांनी मराठी भाषा, मराठी अस्मितेवर ठामपणे बोलायला हवे, असे आवाहन देखील संजय राऊत यांनी केले आहे. शिंदे आता कुठे लपून बसले आहेत? असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित केला.