महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टानं फेटाळलीये. कोर्टानं याचिकेत काहीही दम नसल्याचा निर्णय दिला असला तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकरांचं त्यानं समाधान झालेलं नाहीय. प्रकाश आंबेडकरांनी सरकारला आणि निवडणूक आयोगाला तीन प्रश्न विचारुन कोंडीत पकडलंय.
विधानसभा निवडणुकीच्या मतदानप्रक्रियेवर आक्षेप नोंदवणारी चेतन अहिरे यांची याचिका मुंबई हायकोर्टानं फेटाळलीये. याचिका फेटाळली असली तरी याचिकाकर्त्यांचे वकील प्रकाश आंबेडकरांच्या मनातल्या तीन प्रश्नांचं उत्तर मिळालं नाही असं आंबेडकरांनी सांगितलंय.
76 लाख पावत्या कुठं आहेत?
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघ मिळून तब्बल 76 लाख मतं वाढली…मतदानाची वेळ संपल्यानंतर मतदान केंद्राच्या आवारात जे मतदार असतात त्या मतदारांना पावत्या दिल्या जातात. त्या पावत्या निवडणूक आयोग का देत नाही त्याचा रेकॉर्ड ठेवला की नाही असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांनी विचारलाय.
96 मतदारसंघात मतदान, मतमोजणीत तफावत कशी?
विधानसभा निवडणुकीत जवळपास 96 मतदारसंघात झालेलं मतदान आणि मोजलेली मतं यांच्यात तफावत निघाली. मतांची तफावत असताना निकाल जाहीर करु नये असा नियम आहे. तरीही त्या 96 मतदारसंघांचा निकाल कसा जाहीर करण्यात आला असा सवालही आंबेडकरांनी विचारलाय.
निवडणूक नियमानुसार झाली का?
विधानसभा निवडणूक ही कायदेमंडळानं बनवलेल्या नियमानुसार झाली का?. निवडणूक आयोगानं तयार केलेले नियम पाळले गेले का या प्रश्नांची उत्तर कोर्टात मिळाली नसल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय.
न्यायालय काय म्हणाले?
विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष झालेले मतदान आणि निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर नोंदवलेले मतदान यात विसंगती असल्याचा याचिकाकर्त्यांने केलेला दावा हा एका वृत्तपत्रातील लेखाच्या आधारे केला आहे.
मतदानाच्या शेवटच्या क्षणी म्हणजेच संध्याकाळी 6 वाजता झालेल्या मतदानात गैरप्रकार वा फसवणूक झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला. मात्र, त्यासंदर्भातील कोणत्याही प्रकारची तक्रार केलेली दिसून येत नाही. त्या संदर्भात कुठलीही सामग्री याचिकेसोबत सादर केलेली नाही.
हरि विष्णू कामथ प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा दाखला देत अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केलेला युक्तीवाद स्वीकारता येणार नाही.
याचिका फेटाळली असली तरी प्रकाश आंबेडकर आणि याचिकाकर्त्यांचं समाधान झालेलं नाही. उत्तरं न मिळालेल्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी प्रकाश आंबेडकर जनतेच्या कोर्टात जाणार का असा प्रश्न निर्माण झालाय.