स्वतः ची खुर्ची वाचविण्यासाठी देशात आणीबाणी लागू करुन, निरपराध लोकांना तुरुंगात डांबणे ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भारतीय राज्यघटनेची हत्या होती, अशी भावना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली. तसेच, स्वातंत्र्य आणि राज्य घटनेची
.
भारतीय जनता पक्ष कोथरूड मध्य मंडलच्या वतीने आणीबाणी काळा दिवस साजरा करण्यात आला. यावेळी आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेल्या ज्येष्ठ नागरिकांचा विशेष सत्कार करुन, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यावेळी माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, कार्यक्रमाचे आयोजक भाजपा मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, माजी अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, जगन्नाथ कुलकर्णी यांच्या सह भाजपचे सर्व पदाधिकारी आणि माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देताना माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की, आपल्या देशाला १५० वर्षाच्या प्रदीर्घ संघर्षानंतर स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रुपाने वैभव आपल्या देशाला बहाल केलं. पण स्वतःच्या खूर्चीसाठी कॉंग्रेसने हे वैभव उद्ध्वस्त करुन, देशात आणीबाणी लागू करुन; अनेकांना तुरुंगात डांबलं. या बंदी काळात अनेकांनी प्रचंड हालअपेष्टा सोसल्या. अनेक गरोदर महिलांना देखील तुरुंगात डांबण्याचं काम तत्कालीन सरकारने केलं होतं. त्यांची प्रसूती देखील तुरुंगातच व्हायची, पण कोणीही हार मानली नाही, अशा आठवणी त्यांनी सांगितल्या.
ते पुढे म्हणाले की, आणीबाणी आणि मिसाबंदी हे दोन्ही काळ अतिशय संघर्षाचे होते. मिसाबंदींना अनिश्चित काळासाठी तुरुंगवास भोगावा लागला. त्यामुळे हा संघर्ष काय होता. स्वातंत्र्यासाठी आणि संविधानाच्या पुनर्स्थापनेसाठीचा संघर्ष नव्या पिढीला माहिती असणं आवश्यक आहे. आज कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी खिशात एक पुस्तक घेऊन फिरत आहेत. मात्र ते पुस्तक कोरं आहे, अशी टीका त्यांनी यावेळी केली. तसेच, संघ स्वयंसेवकांच्या जिद्द आणि चिकाटी मुळे देशात पुन्हा संविधानाची पुनर्स्थापना झाली, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
आणीबाणी मध्ये तुरुंगवास भोगलेले मधुसूदन पारखे म्हणाले की, आणीबाणी मध्ये कारागृहात असलेल्या कुणाच्याही मनात खंत नव्हती, उटल तुरुंगवासाच्या काळात सामाजिक कामासाठी नवी ऊर्जा मिळत होती. या कालखंडात असंख्य लोकांनी आपल्या आयुष्याची समिधाच अर्पण केली होती. आज जे लोक संविधान म्हणून ओरडत आहेत, त्यांनी देशात आणीबाणी लागू करण्यासाठी राज्य घटनेची मोड केली, त्यावरही आपली भूमिका मांडावी. सज्जन शक्तीच्या संघर्षाचा इतिहास साक्षीदार आहे, अशी भावना यावेळी त्यांनी व्यक्त केली.