Amitabh Bachchan Cybercrime Callertune: सरकारने अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील सायबर कॉलर ट्यूनच्या वेळेत मोठा बदल केलाय. तुम्ही कोणाला फोन केलात तर सर्वात आधी तुम्हाला सायबर सुरक्षा जागरूकतेसाठी कॉलरट्यून वाजते. आता ही कॉलरट्यून फक्त दिवसातून फक्त दोनदा ऐकू येईल. एमर्जन्सी कॉलवर ही कॉलरट्यून अजिबात वाजणार नाही. अलीकडेच या कॉलरट्यूनसाठी सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना सोशल मीडियावर ट्रोल देखील करण्यात आले होते.
सायबर सुरक्षा जागरूकता नियम
सरकारने सायबर सुरक्षा जागरूकतेसाठी या कॉलर ट्यूनबाबत मोठा बदल केलाय. हा बदल केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C) आणि सायबर दोस्त यांनी घेतलाय. सायबर दोस्त I4C नावाच्या अधिकृत X हँडलवर यासंदर्भात माहिती देण्यात आलीय.
त्यात म्हटल्याप्रमाणे, ‘वारंवार ऐकू येणारी सायबर कॉलर ट्यून – तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे. ही घोटाळ्यांपासून तुमचे रक्षण करते. आता ती दिवसातून फक्त दोनदा वाजेल, आपत्कालीन कॉलमध्ये नाही.’ अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील ही ट्यून सायबर फसवणुकीबद्दल लोकांना सावध करण्यासाठी सुरू करण्यात आली होती. पण ती वारंवार वाजल्याने लोकांचा त्रास वाढत होता. यासाठी नियम बदलण्यात आले आहेत.
सायबर कॉलर ट्यून म्हणजे काय?
कॉल दरम्यान अमिताभ बच्चन यांच्या आवाजातील एक रेकॉर्ड केलेला संदेश वाजत असे. ज्यामध्ये लोकांना ऑनलाइन फसवणुकीपासून सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. ही सायबर कॉलर ट्यून प्रत्येक कॉल दरम्यान ऐकू येते आणि म्हणूनच अनेक लोक सोशल मीडियावर ती काढून टाकण्याची मागणी करत होते.
हा निर्णय का घेण्यात आला?
या कॉलरट्यूनसंदर्भात लोकांकडून सतत तक्रारी येत होत्या. प्रत्येकवेळी कॉल करताना ही ट्यून ऐकू येते. ज्यामुळे महत्त्वाचे कॉल करण्यात विलंब होतो. विशेषतः आपत्कालीन सेवांमध्ये ती अडथळा बनत होती. पण आता ही कॉलरट्यून आपत्कालीन क्रमांकांवर ऐकू येणार नाही.
आता काय बदलणार?
I4C नुसार आता ही ट्यून दिवसातून फक्त दोनदा वाजेल. तसेच आपत्कालीन कॉलमध्ये जसे की पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांना कॉल करताना ती पूर्णपणे बंद करण्यात आलीय. सायबर दोस्तने ट्विट केल्यानुसार, ‘थांबा. विचार करा. कारवाई करा.’ ही फक्त ‘ट्यून नाही, तर तुमच्या सुरक्षिततेसाठी एक संदेश आहे. सोशल मीडियावरील संशयास्पद लिंक्स किंवा अनोळखी कॉल्सपासून सावध राहण्याचे आवाहन जनतेला करण्यात आले आहे.
फसवणूक झाल्यास काय कराल?
जर एखादी व्यक्ती सायबर फसवणुकीचा बळी ठरली तर तो ताबडतोब 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल करू शकतो किंवा cybercrime.gov.in पोर्टलवर तक्रार दाखल करू शकतो.
सायबर फसवणुकीत वाढ
डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाल्याने ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. सरकारचा भर केवळ सुरक्षा तंत्रज्ञानावरच नाही तर लोकांना शिक्षित करण्यावरही आहे.