मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्रात लेख लिहून आणीबाणीच्या मुद्यावरून काँग्रेसवर टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या प्रकरणी त्यांच्यावर पलटवार करत त्यांना स्वतः काचेच्या घरात राहणाऱ्या
.
दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 25 जून 1975 रोजी देशात आणीबाणी घोषित केली होती. त्यांच्या या निर्णयाला आज बरोबर 50 वर्षे पूर्ण झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी एका मराठी वृत्तपत्रात लेख लिहून काँग्रेसवर टीका केली. देशातील एका काळ्याकुट्ट अध्यायाला आज ५० वर्षे झाली. त्याला सुवर्ण महोत्सव म्हणायचे तरी कसे? महोत्सव हा चांगल्याचा करायचा असतो. त्यामुळे संविधान आणि सांविधानिक व्यवस्था आणि लोकशाही पायदळी तुडवणाऱ्या काँग्रेस पक्षाने लिहिलेल्या या अध्यायाला ५० वर्षं झाली, एवढेच म्हणावे लागेल. जुने दिवस कधी विसरायचे नसतात, ते सतत आपल्याला लढण्याचे बळ देत असतात, असे फडणवीस आपल्या लेखात म्हणालेत.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक आहे का?
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी त्यांच्या या लेखावरून भाजपवर तिखट शब्दांत हल्ला चढवला आहे. आज 25 जून, पन्नास वर्षांपूर्वी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आजच्या दिवशी देशावर आणीबाणी लादली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य नावाची गोष्ट शिल्लक राहिली नव्हती. पण आज तरी काय वेगळी परिस्थिती आहे?
आज निवडणूक आयोग स्वतंत्र आहे? माध्यमं स्वतंत्र आहेत? देशातील स्वायत्त संस्थांची स्वायत्तता शाबूत आहे? नाही ना? मग भाजपच्या मंडळींना पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर बोलण्याचा काय अधिकार? आज काहींनी वर्तमानपत्रांमध्ये पन्नास वर्षांपूर्वी लादलेल्या आणीबाणीवर रकाणे भरून काढले आहेत. पण चिनॉय सेठ, जिनके खुदके घर शीशे के होते हैं वो दूसरों के घरपर पत्थर नहीं फेंकते, असे रोहिणी खडसे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आणीबाणीवर काय म्हणाले फडणवीस?
देवेंद्र फडणवीस आपल्या लेखात म्हणतात, आणीबाणीने अनेक कुटुंबांना उद्ध्वस्त केले. अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील कमावती व्यक्ती कारागृहात असताना अनेक कुटुंबे कर्जबाजारी झाली. त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले. अनेकांची संपत्ती जप्त झाली, उद्योग-रोजगार कायमचे संपुष्टात आले. मानसिक आणि आर्थिक अशा दोन्ही पातळ्यांवर मोठे शोषण झाले. माझा वैयक्तिक अनुभव विचाराल, तर मी केवळ पाच वर्षांचा होतो. माझे वडील दि. गंगाधरराव फडणवीस यांनाही अटक झाली होती. त्यांना कारागृहात डबा द्यायला जाताना किंवा त्यांना वैद्याकीय तपासणीसाठी नेताना फक्त भेट होत असे. लहान वयात वडिलांपासून बराच काळ दूर राहावे लागले. त्यामुळे मनातून चीड होती.
आणीबाणीनंतर विधिपालिका, कार्यपालिका आणि न्यायपालिका या व्यवस्थांचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले होते. लोकशाहीचे महत्त्व काय, हे अधिक प्रकर्षाने लोकांना समजले. संविधानावरील श्रद्धा अधिक दृढ झाली. त्या नेत्यांनी संघर्ष केला नसता, तर कदाचित आपल्या देशातसुद्धा हुकूमशाही प्रस्थापित झाली असती. आज जी अवस्था पाकिस्तानची आहे, तीच भारताचीही झाली असती. आज जी लोकशाही जिवंत आहे, ती 50 वर्षांपूर्वी संघर्ष केलेल्या त्या नेत्यांमुळे. आज आणीबाणीपेक्षाही त्या नेत्यांचे स्मरण अधिक आवश्यक आहे.
गांधी घराणे आणि काँग्रेसने केलेल्या शोषणाच्या कथा जितक्या प्रकर्षाने पुढे येतील, त्यातून लोकशाही अधिक भक्कम होत जाईल. आज आम्ही राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आणीबाणीच्या या विदारक कथा चित्ररूपाने प्रदर्शनातून मांडत आहोत. प्रत्येकाने त्याला अवश्य भेट द्यावी. आणीबाणीत संघर्ष करणाऱ्या कुटुंबांनी, लोकशाहीच्या पुनर्स्थापनेसाठी जो लढा दिला, त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरवसुद्धा करणार आहोत. त्या कुटुंबांना मानधन देण्याचा निर्णयसुद्धा राज्य सरकारने घेतला आहे. हे आम्ही लोकशाही रक्षणाच्या मंदिरात वाहिलेले पवित्र पुष्प आहे. येणाऱ्या पिढ्यांनी मात्र हा इतिहास आवर्जून समजून घेतला पाहिजे, असे फडणवीस यांनी आपल्या लेखात म्हटले आहे.