औंढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात सासऱ्याला भांडणाऱ्या व्यक्तींना जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला मारहाण करून महिलेचा विनयभंग करणाऱ्या तिघांवर मंगळवारी ता. २४ रात्री उशीरा औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील महिलेचा सासरे मंगळवारी सायंकाळच्या सुमारास जनावरांच्या गोठ्याकडे जात होते. यावेळी बालाजी वानखेडे, माधव वानखेडे, गणेश वानखेडे यांनी त्यांना अडवून गोठ्याकडे जाण्यासाठी येथून रस्ता नाही. तुम्ही येथून जायचे नाही असे म्हणत त्यांना शिवीगाळ करण्यास सुरवात केली.
यावेळी सदर महिला त्या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी माझ्या सासऱ्याला का भांडत आहात अशी विचारणा केली. मात्र त्यांनी कुठलेही उत्तर न देता महिलेसोबत झटापट करून तिचा विनयभंग केला तसेच सदर भांडण सोडवण्यासाठी महिलेचा पती मध्ये पडला असता त्यांनाही मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली.
याप्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने कुटुंबीयांसह मंगळवारी रात्री औढा नागनाथ पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. यावरून पोलिसांनी वरील तिघांवर मारहाण करून विनयभंग करणे तसेच जिवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे निरीक्षक जी. एस. राहिरे, उपनिरीक्षक शेख खुद्दूस, जमादार मुकाडे, रवीकांत हरकाळ, संदीप टाक यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.