कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील नागरिकांचा रिक्षा प्रवास महागणार आहे. कल्याण आरटीओ क्षेत्रात येणाऱ्या कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आदी भागात शेअर रिक्षांच्या भाड्यात 3 ते 5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तसेच मीटरप्रमाणेही 3 रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या तीन महिन्यांपूर्वी सरकारने भाडेवाढ जाहीर केली होती. मात्र, रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण होईपर्यंत ती प्रत्यक्षात आली नव्हती. आता जवळपास 95% रिक्षांचे मीटर रीकॅलिब्रेशन पूर्ण झाले आहे. त्यामुळे शेअर रिक्षांमध्ये प्रवासाचे अंतर लक्षात घेऊन 3 ते 5 रुपयांनी भाडेवाढ लागू करण्यात आली आहे.
कल्याण आरटीओ क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रामुख्याने चाकरमानी राहतात. घर ते रेल्वे स्थानकांपर्यंत शेअर रिक्षाने प्रवास करतात. या भाडेवाढीचा फटका थेट सामान्य प्रवाशांच्या खिशाला बसणार आहे.
कोरोना काळात रिक्षाचालकांनी शेअर रिक्षांच्या भाड्यात वाढ केली होती. तेव्हा देखील 3 ते 5 रूपयांची वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा रिक्षाचालकांनी 3 ते 5 रूपयांची दरवाढ करण्याचा निर्णय घेतला.
सध्या एका बाजूचा प्रवास 15 रुपयांमध्ये होत आहे. आता 18 ते 20 रुपये मोजावे लागणार असल्याची शक्यता आहे.
कल्याण आणि डोंबिवली परिसरात काही रिक्षा चालक आपल्या मनाप्रमाणे भाडे वसूल करतात. तर, काही कमी रिक्षाचालक मीटरप्रमाणे रिक्षा चालवतात. बाकीचे सरसकट मनाप्रमाणे भाडे प्रवाशांकडून घेतात. यामुळे सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसतो.
हेही वाचा
फास्टॅग वार्षिक पास ‘या’ मार्गांवर लागू होणार नाही