मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात प्रश्न उपस्थित केलेत. यावेळी सवाल करताना राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच आरोप केलाय. राहुल गांधींच्या या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनीही तत्काळ प्रत्यूत्तर देत आकडेवारीच मांडलीय. काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. याआधी एक लेख लिहित राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप केला होता. आता राहुल गांधी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदान वाढल्याचा आरोप केलाय. तर काही मतदान केंद्रांवर 20 ते 25 टक्के मतदार वाढल्याचा आरोप केलाय.
काय आहे राहुल गांधींचे आरोप?
१. मुख्यमंत्री फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले
२. महिन्यांत 8 टक्के मतदार वाढले, काही बूथवर 20 ते 25 टक्के वाढ
३. बीएलओंनी अज्ञात व्यक्तींनी मतदान केल्याचं नोंदवलं
४. निवडणूक प्रक्रियेत गडबड घोटाळा होत असताना निवडणूक आयोग गप्प का?
राहुल गांधी यांच्या या आरोपांनतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर जोरदार पलटवार करत आकडेवारीच सादर केलीय.
फडणवीसांचा राहुल गांधींवर पलटवार :
महाराष्ट्रातील पराभव दिवसेंदिवस तुमच्या जिव्हारी लागतोय. केव्हापर्यंत तुम्ही हवेत वार करत राहणार. महाराष्ट्रात 25 मतदारसंघात 8 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान वाढलं. आणि काही जागांवर काँग्रेस जिंकली. पश्चिम नागपूर विधानसभेत 7 टक्के मतदान वाढलं. त्याठिकाणी 27 हजार 65 मतदार वाढले. काँग्रेसचे विकास ठाकरे जिंकले. उत्तर नागपूर विधानसभेत 7 टक्के मतदान वाढलं, त्या ठिकाणी 29 हजार 348 मतदार वाढले, आणि काँग्रेसचे नितीन राऊत जिंकले. पुण्यातील वडगाव-शेरीत 10 टक्के मतदान वाढलं. त्या ठिकाणी शरद पवार गटाचे बापूसाहेब पठारे जिंकले. मालाड पश्चिम मतदारसंघात 11 टक्के मतदान वाढलं. त्या ठिकाणी काँग्रेसचे अस्लम शेख जिंकले. मुंब्र्यात 9 टक्के मतदान वाढलं. त्या ठिकाणी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड जिंकले. राहुल गांधींच्या आरोपांनंतर राज्यातही काँग्रेस आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्यात.
हेही वाचा : गावच्या राजकारणामुळे विकास रखडला, कंटाळलेल्या सरपंच महिलेचे अजित दादांना भावनिक पत्र
राहुल गांधींचे आरोप, राज्य निवडणूक आयोगाचं उत्तर :
1. निवडणूक आयोगाने आधीच कळवल्याप्रमाणे मतदार याद्या सर्व मान्यता प्राप्त राजकीय पक्षांना वाटल्या जातात. महाराष्ट्र विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या दुसऱ्या विशेष सारांश पुनर्निरीक्षण – 2024 दरम्यान सर्व 288 मतदारसंघांचा मसुदा आणि अंतिम मतदार याद्यांच्या प्रती काँग्रेससह सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना देण्यात आल्या.
2. मतदार याद्यांचा मसुदा आणि अंतिम प्रकाशनादरम्यान 19 लाख 27 हजार 508 दावे आणि आक्षेप विचारार्थ प्राप्त झाले
3. कायद्यानुसार मतदारयादीमधील समाविष्ट नावांविरोधात आणि नावं वगळण्यासाठी अपील दाखल करता येतं. यासंदर्भात फक्त 89 अपील आयोगाकडं प्राप्त झाले आहेत.
या आधीही महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप राहुल गांधींनी एका लेखाच्या माध्यमातून केला होता. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी लेखातूनच उत्तर दिलं होतं. आता पुन्हा राहुल गांधींनी केलेल्या आरोपाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्रत्यूत्तर दिलंय.