शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे गत काही दिवसांपासून नाराज असणारे नेते भास्कर जाधव यांनी सोमवारी आपल्या नाराजीविषयी एक सूचक विधान केले. मी आधी गोष्टी करतो, त्यानंतर सांगतो. मी नाराज असल्याच्या चर्चेला अर्थ नाही. पण उद्या नियतीच्या पोटात काय दडलं
.
भास्कर जाधव यांनी सोमवारी रत्नागिरी जिल्ह्यातील आपल्या समर्थकांना घरी बोलावून त्यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर आयोजित एका पत्रकार परिषदेत त्यांनी उपरोक्त विधान केले. जाधव म्हणाले, मी ठाकरे गटात नाराज असल्याच्या चर्चेला काहीही अर्थ नाही. मी माझ्या मनातील व्यथा मांडली. त्यावर कोण काय बोलले त्यावर भाष्य करण्याची गरज मला वाटत नाही. ज्या गोष्टी माझ्या मनात नाहीत त्यावर मी खुलासा करत नाही. मी आधी गोष्टी करतो, त्यानंतर सांगतो. पण नियतीच्या पोटात उद्या काय दडलंय हे कुणालाही सांगता येत नाही.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घेतली जबाबदारी
आपल्या सहकाऱ्यांशी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा केल्याचेही त्यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर चर्चा करण्यासाठी मी जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मी रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका व पंचायत समितीच्या निवडणुकीची जबाबदारी अंगावर घेत आहे. मी ही जबाबदारी केवळ अंगावरच घेऊन थांबणार नाही तर पक्षालाही यश मिळवून देईन.