Abu Azmi Comment About Pandharpur Wari: समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी सोलापूरमध्ये आषाढीच्या वारीसंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अबू आझमी यांच्या या विधानावर प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापल्याचं दिसून आले. विशेष म्हणजे अबू आझमी यांनी केलेल्या विधानाचा अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनीही निषेध केला आहे. अबू आझमी नेमकं काय म्हणाले आणि त्यावर मुख्यमंत्र्यांबरोबरच प्यारे खान काय म्हणालेत ते पाहूयात…
अबू आझमी काय म्हणाले?
संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांची पालखी सध्या पुण्याच्या दिशेने पंढरपूरकडे प्रस्थान करत आहे. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वारीबाबत मोठं विधान केलं. अबू आझमी यांनी आषाढी वारीमुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी होते आणि रस्ता जाम होतो, असं म्हटलं आहे. “हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुसलमान व्यक्ती विरोध करत नाही. मात्र मुसलमानांनी नमाज अदा केल्यावर तक्रारी करतात,” असं वादग्रस्त वक्तव्य अबू आझमी यांनी केले आहे. आझमींच्या या विधानामुळे राजकीय वादंग निर्माण झाला आहे.
“मशिदीबाहेर नमाज पठण करु शकत नाही. आज मी येत होतो तेव्हा आम्ही हिंदू बांधवांसोबत खांद्याला खांदा लावून चालतो. आजपर्यंत कोणत्याही मुसलमान बांधवांनी रस्त्यावर सण साजरे केले जातात त्याची तक्रार केली नाही पण ज्या वेळेस मशिदीमध्ये नमाज पठण केला जातो तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणतात, बाहेर जर नमाज पठण केलं तर पासपोर्ट आणि ड्रायव्हिंग परवाना ही रद्द केला जाईल. आज सोलापूरला येत असताना मला सांगितलं पालखी येते, लवकर जाऊ नाहीतर रस्ता जाम होईल. वारीमुळे रस्ता जाम होतो आम्ही कधी त्याला मनाई केली नाही. जाणून-बुजून मुसलमानांसाठी जमीन दिली जात नाही,” असं अबू आझमी म्हणाले.
या विधानामुळे महाराष्ट्रात कुठे दंगल झाली तर…
अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी अबू आजमी यांचं वारीसंदर्भातील वक्तव्य अवाजवी असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे, असं म्हणत या विधानाचा निषेध केला आहे. “महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोग त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत असून आयोग अबू आझमीच्या वक्तव्यासंदर्भात त्यांना सेक्शन दहाप्रमाणे नोटीस ही बजावणार आहे, असंही प्यारे खान यांनी म्हटलं आहे. “गरज भासली तर त्यांना आयोगासमक्ष उपस्थित राहून उत्तर देण्यासही सांगू असेही अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्षांनी म्हटलं आहे. जर अबू आजमी यांच्या वारीसंदर्भातल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कुठे दंगल झाली तर जवळच्या संबंधित पोलीस स्टेशनमध्ये अबू आजमी यांच्या विरोधात गुन्हाही दाखल केला जाईल, असेही प्यारे खान यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री फडणवीस संतापून म्हणाले, ‘आझमींच्या फालतू…’
अबू आजमींच्या वक्तव्यावरुन नागपूरमध्ये पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारुन प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावर फडणवीस यांनी संतापून, “अबू आजमी यांना वादग्रस्त विधान करण्याचा शौक आहे. वादग्रस्त विधान केले की प्रसिद्धी मिळते असे त्यानं वाटते. त्यामुळे अबू आजमी यांना प्रसिद्धीच्या लायक समजत नसल्यामुळे त्यांच्या फालतू वक्तव्याला उत्तर देणार नाही,” असं उत्तर दिलं.