आशीष अम्बाडे, झी 24 तास, चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यातल्या सोमय्या आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज हॉस्पिटलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाच्या सोमय्या मेडिकल कॉलेज व्यवस्थापनाचे अध्यापन- व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. स्थापनेनंतर कुठलीही सुविधा नसल्याने राज्यभरातून डॉक्टर होण्यासाठी आलेले विद्यार्थी आंदोलक झालेत. प्राचार्य पद रिक्त असणे, विभाग प्रमुख, प्राध्यापक पदे रिक्त असणे, पुढील वर्षाची फी आधीच मागणे यासह कुठलेही बाह्य रुग्णसेवा प्रशिक्षण मिळत नसल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. संस्थाचालकांनी या शिक्षणाचा व्यवसाय केल्याचा आरोप होत असून पालक सभेमध्ये संस्थाचालकांनी उद्धट उत्तरे दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय.
प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रवेशावेळी 2 लाख रुपये प्रवेश फी आकारण्यात आली असून अद्याप प्रथम वर्षाची परीक्षा देखील पार पडलेली नाही. तरीदेखील महाविद्यालय प्रशासन द्वितीय वर्षाची फी भरण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकत आहेत. आर्थिक अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना ‘फी भरण्याची ऐपत नसेल तर प्रवेश कशाला घेतला?’ अशा शब्दांत बोलून मानसिक छळ केला जात आहे. इतकेच नव्हे तर पालकसभेत पालकांशी असभ्य वर्तन करत शिवीगाळ केली गेल्याचे विद्यार्थी व पालकांनी स्पष्ट केले आहे.
ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन ढासळत असं सांगण्यात येत आहे. संस्थेच्या अन्यायकारक धोरणाचा तीव्र निषेध करत, प्रथम वर्षाची परीक्षा झाल्याशिवाय दुसऱ्या वर्षाची फी आकारू नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.
काय आहे विद्यार्थ्यांचा समस्या?
शैक्षणिक सुविधा
प्राध्यापकांची कमतरता, ज्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
पुस्तकांची आणि अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची अपुरी उपलब्धता.
वर्गखोल्यांची आणि प्रयोगशाळांची दुरवस्था.\
वसतिगृह
अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या.
पिण्याच्या पाण्याची आणि स्वच्छतेची गैरसोय.
सुरक्षिततेचा अभाव.
प्रात्यक्षिक (प्रॅक्टिकल) शिक्षण
पुरेशा उपकरणांची आणि उपचारांच्या सुविधांची कमतरता.
रुग्णांची संख्या कमी असल्याने विद्यार्थ्यांना पुरेसा अनुभव मिळत
विद्यार्थ्यांच्या बाजूने आता चंद्रपूरच्या सामाजिक संघटना देखील उतरल्या आहेत. त्यांनी विद्यार्थ्यांना सोबत घेत जिल्हाधिका-यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवले आहे. विद्यार्थ्यांचा न्याय्य मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि या अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आलाय.
या संदर्भात सोमय्या मेडिकल कॉलेज चालविणाऱ्या संस्था चालकांशी संपर्क साधला असता काही विद्यार्थी नापास झाले असून त्यांनी अशा पद्धतीने आंदोलन उभारल्याचे सांगत महाविद्यालयात प्राचार्य आहेत, प्राध्यापक देखील आहेत. पहिलीच बॅच असल्याने काही अडचणी आहेत मात्र त्या निश्चित दूर होतील असा युक्तिवाद केलाय. विद्यार्थ्यांच्या आरोपात तथ्य नसल्याचे संस्था प्रमुख पांडुरंग आंबटकर यांनी स्पष्ट केले आहे.