EXCLUSIVE : ‘शरद पवारांना सोडणं आयुष्यातील खूप मोठी चूक’; टू द पाइंटमध्ये भास्कर जाधव यांनी व्यक्त केली खंत


Bhaskar Jadhav on Sharad Pawar : शरद पवार यांना सोडून शिवसेनेत आलो ही सर्वात मोठी चूक होती, आता त्याचे परिणाम भोगावे लागत असतील अशी कबुली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी झी २४ तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात दिली आहे. झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत भास्कर जाधव यांनी अनेक गौप्यस्फोट केलेत. 

राज्यात महाविकास आघाडीचे 2019 मध्ये सरकार आल्यावर भास्कर जाधव यांना मंत्रीपद देण्यात आले नाही. पवारांची साथ सोडल्यामुळे पवारांनी भास्कर जाधव यांना मंत्रीपद मिळू दिले नाही का? आजवरचा इतिहास आहे की पवारांना जे सोडून गेले त्यांना भविष्यात कोणतंही पद मिळालं नाही.  या प्रश्नावर उत्तर देताना भास्कर जाधव म्हणाले, शरद पवार हा मोठ्या मनाचा माणूस आहे. त्यांनी माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल असे  मला वाटत नाही.  पण त्यांनी जर केले असेल तर ते बरोबर केलं आहे. पवार साहेबांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती अशी कबुली जाधव यांनी दिली.  

पवारांनी माझ्या मंत्रीपदाला जर विरोध केला असेल तर त्यामागचे कारण सांगताना जाधव म्हणाले, मी शिवसेनेत होतो, त्यावेळी उमेदवारी मिळण्याची लायकी नसताना ज्या माणसाने मला राष्ट्रवादीत घेतलं. राज्याचं सरचिटणीस केलं. विधान परिषद मला दिली, निवडून आणलं. विधानसभा दिली, निवडून आणलं. मला मंत्रीमंडळात घेतलं. मला पक्षाचा अध्यक्ष केला. त्या व्यक्तीने मी पक्ष सोडल्यावर माझ्या मंत्रीपदाला विरोध केला असेल. तर ते बरोबरच केलं. शेवटी मला माझं प्राक्तन भोगलं पाहिजे. माझ्याकडून चूकच झाली होती. पवारांना सोडून जाणं ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, अशी कबुली भास्कर जाधव यांनी या कार्यक्रमात दिली. 

भास्कर जाधव पुढे म्हणाले,  हे मी आज शिवसेनेत असताना बोलतो आहे. कदाचित या बोलण्याचे मला परिणाम भोगावे लागतील, हेही मला माहिती आहे. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे. पण मी पुन्हा एकदा सांगतो पवार साहेबांना नक्की हे केलं नसेल. कारण त्यांचं माझ्यावर आजही प्रेम आहे, असा विश्वास भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.  

पवारांना अनेकांनी सोडलं… पण माझ्यावर प्रयोग

शरद पवार यांना अनेक जण सोडून गेले. त्यावेळी त्यांनी खंत व्यक्त केली नाही, पण मी सोडून आल्याचं त्यांना दुःख झाले होते. हे मला नंतर कळलं.  मी अध्यक्ष असताना पवार साहेबांना गंमतीने विचाराचो. सगळे तुम्हांला सोडून जात आहेत. तुम्ही सर्वांना माफ का करतात. त्यांना धडा का शिकवत नाही.  त्यावर पवार हसायचे. मला कदाचित वाटतं  पवार साहेबांनी पहिला प्रयोग माझ्यावर केला असेल, हा भास्कर जाधव मला सोडून गेला. तर पहिला प्रयोग याच्यावरच करू या.  त्यामुळे मला मविआ सरकारमध्ये मंत्रीपद मिळालं नसेल, असे हसून भास्कर जाधव यांनी विषय टाळण्याचा प्रयत्न केला.  

माझं राजकीय हित सांभाळणं पवारांची जबाबदारी नाही

मविआची सत्ता आली तेव्हा मला मंत्रीपद का दिलं नाही मला माहिती नाही. पण माझ्या मंत्रीपदाला पवारांनी विरोध केला असेल असे मला वाटत नाही. माझं राजकीय हित सांभळणं  पवारांचे काम नव्हते. आपण ज्या पक्षात जातो त्या पक्षाचं काम असतं असे म्हणून त्यांनी अप्रत्यक्ष हे काम उद्धव ठाकरेंचे होते असे यावेळी सूचित केले.

दरम्यान संपूर्ण मुलाखत पाहा आज रात्री 9.00 आणि रविवारी 22 जूनला दुपारी 12.00 वाजता फक्त झी 24 तासवर..





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Yuvasatta Times News 24